पानगळ –

 

पानगळ




वातावरणातला बोचरा गारवा जरा माघार घ्यायला लागतो आणि झाडांवर लसलसत्या पर्णकळ्यातून पोपटी पानांचा बहर झाडाला आच्छादून टाकतो. चमकदार पोपटी पानं पोक्तपणे गडद हिरवी होतात. फुलांचा बहर येतो आणि फुलांचा ऋतु संपतो, फळांचाही संपतो. लाल, पिवळी, केशरी फुलं गळून पडतात, फळंही पिकतात,पडतात, काढून घेतली जातात. चैतन्यानी आणि विविध चमकदार रंगांनी डवरलेलं झाड परत अति सामान्य होऊन जातं.  आपल्याच फुलाफळांच्या रंगांच्या आठवणींनी बेचैन झालेल्या द्रुमाला शिशुंच्या रंगस्वप्नांना हृदयाशी धरून उचंबळून येतं. त्यांच्याच स्वप्नात तो रंगून जातो. त्यांच्याच रंगात रंगून पर्णसृष्टी अखेरचं जीवन व्यतीत करते.

 

पसरता भुवी सुमनरंग, आरक्त शेंदरी पिवळे

झेलले पर्णराजीने, करुनिया द्रोण हृदयांचे

 

शैशव शिशुंचे लडिवाळ, ती त्यांचीच रंगस्वप्ने

कधि मातीत ना मिळावी, म्हणुनी पर्ण किती झटले.

 

टाकुनी रंग अपुलाले , ते हिरव्या छटा छटांचे

त्यजुनीच काम नेमाचे, का शिशुरंगस्वप्न जगले

 

जाताच लेकरू दूरी, हो कालवाकालव हृदी

अन मिटलेच जीवन तरी, ये शिशुरंग सोबतीसी

 

ती झडली तरूवरूनी, जरि मातीत सर्व पाने

मृदु रंग गहिरे सुमांचे, नित जपतीच चित्तभावे

-----------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

Comments